बीड : बीड शहरातील अनेक महत्त्वाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (दि.२३) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकार यांच्या दालनात बैठक घेतली. या बैठकीत बीड शहरातील भुयारी गटार योजना, नगर रोडवर जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी दुभाजक खुला करणे, नवीन अटल अमृत योजनेचे नळ कनेक्शन तसेच शहरात सुरू असलेली स्वच्छता मोहीम या महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड शहरात भुयारी गटार योजना अर्धवट अवस्थेत बंद पडली आहे. ही बंद पडलेली कामे तातडीने पुनरुज्जिवीत करण्याची मागणी यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली. तसेच नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालयात जाण्यासाठी नागरिकांना रस्ता दुभाजक खुला करण्याची गरज व्यक्त केली. यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असे मत आ. क्षीरसागर यांनी मांडले.याशिवाय, अमृत अटल जल योजनेंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे अनेक नागरिकांना अद्याप कनेक्शन मिळालेले नाहीत. ही कनेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. यासोबतच, बीड शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, यंत्रणांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन आ. क्षीरसागर यांनी केले. दरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह बीड नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.