बीडचा पाणी प्रश्न तत्काळ सोडवा; पालकमंत्री ना.अजित पवारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
डॉ.योगेश क्षीरसागरांच्या मागणीची दखल; लवकरच पाणी टंचाई दूर होण्याची अपेक्षा
बीड : शहरातील गंभीर पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागणीची गंभीर दखल घेत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तत्काळ बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाणी टंचाई दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बीड शहरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून नियमित आणि वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येच्या समाधानासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांची भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी हा प्रश्न पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर मांडला. त्यानंतर अजितदादा यांनी दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. प्रशासनाकडून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून, लवकरच शहरातील पाणी टंचाई दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.